
– तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतकरी हिताच्या विविध मागण्या साठी ता.१६ ऑक्टोंबर रोजी शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाध्यक्ष संजय आवारे यांचे नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी मारेगाव तहसील कार्यालयावर धडक दिली.यावेळी विविध मागण्या असणारे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
मारेगाव तालुक्यात गत काही वर्षापासून शेतकरी आत्महत्येत कमालीची वाढ झाली आहे.अस्मानी व सुल्तानी संकटाचा कायम बळी पडत असलेल्या बळीराजास सर्व स्तरावरून मदतीचा हात देण्याची नितांत गरज आज तालुक्यात निर्माण झाली आहे.
दरम्यान ता.१६ ऑक्टोबर रोजी शेतकरी हिताच्या विविध मागण्या संबंधीचे निवेदन शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.
सदर निवेदनात मुख्यत्वे सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, निराधारांना दसऱ्यापूर्वी मानधन देण्यात यावे, पीक विम्याचा लाभ सरसकट देण्यात यावा, पिक विम्यात येलो मोझॅकचा समावेश करण्यात यावा, अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत पुरवावी, कपाशीची आयात विदेशातून करू नये, सरकारी शाळांचे खाजगीकरण करू नये, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवावी, जंगली प्राण्यांपासून झालेली शेतीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, शासकीय रुग्णालयात औषध व कर्मचाऱ्यांचा पुरवठा सुरळीत करावा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख (उ.बा.ठा.) संजय आवारी यांचेसह नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे,युवा सेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे, सुनील गेडाम,गुरुदेव घोटेकर,चंद्रशेखर थेरे, मनोज वादाफळे, विजय अवताडे,दिगांबर नावडे,टुमदेव बेलेकर,सुरेश पारखी,राजु मोरे, मुकुंदा निवल,शुभम लालसरे,गजानन ठाकरे,संजय जिवने, गणेश आसुटकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.