– मे अखेर ३१७ मोजणी प्रकरणे खोळंबली
– नागरिकांना घ्यावे लागत आहे हेलपाटे,वरिष्ठांचे कमालीचे दुर्लक्ष
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुकास्थळी असलेल्या भुमि अभिलेख कार्यालयात एकुण पदसंख्या २० असताना मात्र तब्बल ११ वर पदे रिक्त असल्याने निम्म्याहुन कमी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर भुमि अभिलेख कार्यालयाचा कारभार चालत असुन रिक्त पदाचे ग्रहण लागलेल्या या कार्यालयात मे अखेर ३१७ मोजणी प्रकरणे खोळंबली आहे.
त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना सतत हेलपाटे घ्यावे लागत असुन सोबतच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मात्र अजुनही या गंभीर बाबींकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.
आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभरावर गावखेडी असल्याने तालुकास्थळी भुमि अभिलेख कार्यालय आहे.परंतु मागील अनेक दिवसांपासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे.
कार्यालयात २० कर्मचारी पदे असतांना ९ कर्मचारी कार्यरत असुन ९ पैकी २ कर्मचारी प्रतीनियुक्ती वर आहेत.उर्वरित ७ कर्मचाऱ्यांपैकी २ शिपाई असल्याने फक्त ५ कर्मचाऱ्यांवर मारेगाव स्थीत भुमी अभिलेख कार्यालयाचा डोलारा उभा असुन या ५ कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचाऱ्यांची बदली झाल्याचे विदारक वास्तव आहे.
बदली ३ ची झाली मात्र २ कर्मचाऱ्यांची नियुक्ती मारेगाव भुमी अभिलेख कार्यालयात झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी ते दोन कर्मचारी अजुन तरी रुजु झालेले नाही. त्यामुळे मे अखेर पर्यंत तातडी, अतीतातडी, व साधारण अशी तब्बल ३१७ मोजणी प्रकरणे खोळंबली असल्याचे वास्तव आहे.
एकुणच भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराने विशेषतः शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला असुन साधा शेतीचा नकाशा पाहीजे असल्यास शेतकऱ्यांना चार चार दिवस हेलपाटे घ्यावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय होवुन आर्थिक फटका सुध्दा सहन करावा लागतो.जनता त्रस्त असली तरी या गंभीर बाबीकडे लोक प्रतिनिधी तथा वरिष्ठांकडून डोळेझाक होत असल्याचे तालुक्यात सूतोवाच आहे.





