– लक्ष देण्याची गरज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरात दर मंगळवारला आठवडी बाजार भरतो.रस्त्यावर भरत असलेल्या बाजारामुळे वाहनधारकांसह पायदळ चालणे कठीण असताना बाजारात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्याने नागरिक पुरते वैतागले आहे.संबंधित विभागाने सदर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील १०८ गावांकरिता सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे मारेगाव.तालुक्यात रोज-मजुरी करून जगणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने येथील आठवडी बाजारात दर मंगळवारी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळते.
परंतु गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजारात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असून ही जनावरे कधी रस्त्याच्या मधोमध उभी असतात तर कधी नागरिकांची वाट अडवून धरतात.परिणामी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
बाजार परिसरातील दुकानदारांनी टाकलेला हिरवा पाला खाण्याकरिता मोकाट जनावरे बाजारात ठाण मांडून बसतात.हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




